पूर्वी लोक घरे, वाडे व गोठा बांधण्यासाठी दगडांचा वापर करत असत. परंतु एकविसाव्या शतकात लोक बांधकामासाठी मातीच्या विटांचा वापर करू लागले आहेत, त्याचे कारण असे कि दगडांच्या भिंतीला प्लास्टर बसत नाही.
तसेच दगडे वजनाने जड असल्यामुळे बांधकाम करणे कठीण जाते. या उलट मातीच्या विटा वजनाने हलक्या व टिकाऊ असतात.
विटांच्या बांधकामाला अनेक वर्ष काहीच होत नाही. मातीच्या विटांचे बांधकाम टिकाऊ ठरत आहे. कदाचित यामुळेच तर मातीच्या वीटभट्टीला चांगले दिवस आले आहेत.
मातीच्या विटांचे प्रकार

मातीच्या विटांचे सध्या दोनच प्रकार उपलब्ध आहेत. एक आहे बारीक वीट आणि दुसरी आहे ठोकळा विट.
बांधकामासाठी ठोकळा विटेचा वापर फार कमी केला जातो. बांधकामासाठी बारीक मातीच्या विटांचा जास्त वापर केला जातो.
मातीच्या वीटभट्टी करिता माती कुठून मिळते
वीटभट्टी व्यवसायातील सर्वात महत्त्वाचा व मोठ्या प्रमाणात लागणारा कच्चामाल ही माती आहे.
जर मातीच वेळेवर व पुरेशी मिळाली नाही तर वीट भट्टी व्यवसाय माती मिळेपर्यंत थांबवावा लागतो.
असे अनेक वीट भट्टी व्यवसाय मातीच्या अनउपलब्धतेमुळे बंद अवस्थेत पडलेले आहेत.
दर्जेदार माती नदीपात्रातील आणि तलाव पात्रातून उचलली जाते. काही वेळा माती शेतकऱ्यांच्या जमिनीतून विकत आणली जाते.
नदीपात्रातील तलाव पात्रातील माती सरकारी निलाव्यामध्ये खरेदी करावी लागते. तरच ती व्यवसायासाठी वापरता येते.
विना शासकीय परवान्याशिवाय नदीपात्रातील तलाव पात्रातील माती उचलल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते.
मातीची वीट कशी तयार केली जाते.

सर्वप्रथम मातीच्या विटा तयार करण्याकरिता आवश्यक तितकी माती खोऱ्याच्या मदतीने ओढली जाते. त्यानंतर कारखान्यातील बगास व कोळशाची राख उरलेल्या मातीच्या ढीगावर टाकली जाते.
यानंतर या मिश्रणावर पाणी सोडून ते मिश्रण रात्रभर भिजवण्याकरता ठेवले जाते.
सकाळी मातीचा ढीगाचा रोटरच्या मदतीने चिखल केला जातो. पुन्हा तो चिखल पायाने तुडवला जातो.
पायाने चिखल तुडवल्यामुळे चिखल मऊ बनतो.
यानंतर केलेला चिखल विटा तयार करण्याच्या साच्यामध्ये भरून विटा तयार केला जातात. विटा तयार करणे यालाच विटा थापणे असे म्हणतात.
तयार विटा भट्टीला भाजण्याकरिता कधी लावतात
साच्यामधून तयार केलेल्या मातीच्या विटा सुकण्यासाठी जमिनीवर ठेवल्या जातात.
नंतर आठ ते बारा दिवसांनी या भाजण्याकरता भट्टीला लावल्या जातात.
मातीच्या विटा साच्यामधून तयार केल्यानंतर त्या विक्री योग्य होण्यासाठी जवळपास एक महिना जातो.
वीटभट्टी करता लागणारा कच्चा माल

वीट भट्टी व्यवसायासाठी प्रामुख्याने कोळशाची राख, दगडी कोळसा, गाळाची माती, कारखान्याचे बगास आणि मुबलक पाणी लागते.
कोळशाची राख
मातीची वीट तयार करताना कोळशाची राख मातीमध्ये मिसळली जाते.
लोखंडाच्या कंपनीतून शिल्लक राहिलेली राख विकत आणली जाते आणि ती मातीमध्ये वीट तयार करताना वापरली जाते.
कोळशाची राख मातीमध्ये मिसळल्यामुळे विटेला भक्कमपणा येतो.
दगडी कोळसा
दगडी कोळसा मातीच्या तयार झालेल्या विटा भाजण्यासाठी वापरला जातो.
चंद्रपूर मधील दगडी कोळशाच्या खाणीतून दगडी कोळसा मातीच्या वीटभट्टी करिता आयात केला जातो.
हा दगडी कोळसा सहा ते दहा हजाराच्या आतमध्ये प्रति टन वजनामध्ये मिळतो.
खंगरी विटा
मातीच्या वीट भट्टीवर काही खराब विटांचा ढीग पाहायला मिळतो. या खराब विटा बांधकामासाठी वापरल्या जात नाहीत.
या खराब विटांना खंगरी विटा असे म्हणतात. मुजरांकडून मातीमध्ये लाकडी कोळसा जास्त झाल्यामुळे अशा खंगरी विटा तयार होतात.
वीट भट्टीसाठी आवश्यक मजूर

वीटभट्टी चालवण्याकरिता पुष्कळ मनुष्यबळाची गरज असते. यामध्ये वीट तयार करणारे मजूर यांचा समावेश होतो. तर ट्रॅक्टर रोटर चालवण्याकरता ड्रायव्हरची गरज लागते.
पाण्याची मोटर चालू बंद करणे व इतर किरकोळ कामे करण्याकरिता एखादा पुरुष मजूर गरजेचा असतो. वीटभट्टी व्यवसायात स्थानिक मजूर मिळत नाहीत.
मजुरांना दूरच्या मुलखावरून उचल देऊन आणावे लागते. यातील काही मजूर रात्रीचे पळून जातात. यामुळे मजुरांना अगोदरच दिलेले पैसे बुडण्याची शक्यता असते.
मजूर जोडी
वीट भट्टीवर शक्यतो पती-पत्नी मजूर म्हणून निवडले जातात. एक मजूर जोडी रोज 1000 ते 2000 विटा तयार करते.
ज्यावेळी मजूर जोडी दिवसाला एक हजाराच्या वर विटा तयार करते तेव्हाच त्यांना परवडते.
मातीच्या विटा कच्च्या आढळण्याची कारणे
मातीच्या विटा भट्टीला भाजण्याकरता लावल्यानंतर काही वेळेस त्या पाऊस आल्यानंतर विटा अर्धवट भाजल्या जातात.
तर काही वेळा मातीमध्ये चुनखडी असल्यास चुनखडीचा भुगा होतो. चुनखडी जागेवर बसते.
कच्या विटा फोडून त्या मातीमध्ये मिसळल्या जातात व पुन्हा योग्य मिश्रण वापरून नवीन विटा तयार केल्या जातात.
मातीच्या वीट भट्टीवर मजूर पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास विटा तयार करण्याचे काम चालू करतात आणि सकाळी आठ ते नऊ पर्यंत त्यांचे काम संपते. मधील काळा ते विश्रांती घेतात.
वीटभट्टी व्यवसायात लागणारी यंत्रे
वीटभट्टी व्यवसायात प्रामुख्याने ट्रॅक्टर व ट्रोली, रोटर यंत्र, विटा तयार करण्याचे साचे इत्यादी साधने लागते.
माती चाळण्याची मशीन
या यंत्राच्या मदतीने माती चाळली जाते. यंत्रातून मिळालेली सुपीक बारीक माती विटा तयार करताना वापरली जाते.
त्यामुळे मातीच्या विटांची गुणवत्ता सुधारते उत्पादन वाढते.
ट्रॅक्टर व ट्रोली
विक्री योग्य मातीच्या विटा ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रॅक्टर व ट्रोलीचा वापर केला जातो.
मातीची वाहतूक व इतर आवश्यक कच्च्या मालाची वाहतूक करण्याकरता ट्रॅक्टर ट्रॉलीची गरज पडते.
रोटर यंत्र
चिखल तयार करण्यासाठी रोटर यंत्राचा वापर केला जातो.
विटा तयार करण्याचे साचे
ठोकळा व बारीक विटा तयार करण्यासाठी त्या मापाचे साचे लागतात.
मातीची वीट भट्टी व्यवसायातील अडचणी
माती वेळेवर न मिळणे.
मातीची वाहतूक खूप दूर अंतरावरून करावी लागते, त्यामुळे वाहतूक खर्च वाढतो व नफा कमी मिळतो.
मजूर न मिळणे आणि जर मिळालेच तर विश्वासू प्रामाणिक न मिळणे. काही वेळा मजूर रात्रीचे पळून जातात त्यामुळे त्यांना दिलेली पैसे बुडतात.
वीज पुरवठा सतत खंडित होणे. खंडित वीज पुरवठ्यामुळे यंत्रे बंद पडतात. काम बंद पडते. पाण्याच्या मोटारी बंद पडतात. पाणी वाहून आणताना अडचणी येतात.
कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे प्रति वितेमागे अतिशय कमी नफा मिळतो. ज्या व्यवसायिकांना स्वतःची जागा उपलब्ध नाही त्यांना जागा भाडेतत्त्वावर घ्यावी लागते.
शासनाच्या बदलत्या नियमांमुळे नदीपात्रातील तलाव पात्रातील माती मिळणे जाचाचे झाले आहे. पावसाळ्यात पाऊस पडल्यामुळे सगळीकडे चिखल पाहायला मिळतो.
यंत्रे वाहने चालवताना अडचण येते. विजेचे खांब व तारा पडतात, यामुळे वीज प्रवाह खंडित होतो. परिणामी पाऊस चांगला उघडेपर्यंत काम थांबवावे लागते.

Uday Waghmare is the author of this blog. He is passionate about writing in the field of business and is trying his best to provide business-related information in the Marathi language on this blog.